Wednesday, January 12, 2011

काही तरी भन्नाट..शक्य असलेलं जग

झोप झालेली नसते त्यावेळेस अहमदाबाद येतं. सकाळ काहीशी निळसर वाटते, थांबल्यासारखी. दिवस उजाडण्यापुर्वी भरून राहिलेलं एक निशब्द जग. अहमदाबादला उतरतो, घ्यायला गाडी आलेली असते. मला गांधीनगरला जायचं असतं. गाडीत बसतो. अहमदाबाद रेल्वे स्टेशनवर कायम गर्दी असते. काही जण अजुनही झोपेतच असतात. पण गाडी गांधीनगर रस्त्याला लागली की शहर भर्रकन संपल्यासारखं वाटतं. शहरात कुठेही राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या होर्डींग्ज नाहीत की सकाळी सकाळी त्यांच्या मुंडक्यांचे फोटो पाहावे लागतील. मोदींचेही कुठे होर्डींग्ज दिसत नाहीत. अहो आश्चर्यम.
अहमदाबाद कुठं संपतं आणि कुठं गांधीनगर सुरु होतं हे लक्षात येत नाही. पण गाडी चकाचक रस्त्यांना लागली, ट्रॅफिकचे साईन बोर्ड सगळे जिथल्या तिथं दिसले, थोडीशी झाडी दिसायला लागली, स्वच्छ चौपदरी रस्ता लागला की आपण गांधीनगरमध्ये असल्याचं ओळखायचं. माझी आणखी एक खून. गाडीनं नर्मदेचा पाण्यानं भरलेला कॅनॉल ओलांडला की गांधीनगरमध्ये पोहोचल्याची पक्की खून पटते. मला ही जास्त जवळची वाटते कारण हे शांतपणे वाहणारं पाणी सातपुड्याच्या डोंगरात पडलेलं असेल ज्यानं गुजरात समृद्ध होतोय.
गांधीनगर हे राजधानीचं शहर. पण गुजरातची आर्थिक राजधानी अहमदाबादच. सगळे बाजार, व्यवहार अहमदाबादमध्येच. काही मोठी खरेदी करायची झाली तरी गांधीनगरहून अहमदाबादलाच आलेलं बरं. २० किलोमीटर पाऊनतासाचा रस्ता. अहमदाबाद-गांधीनगर म्हणजे दोन जुळी शहरं. सिकंदराबाद-हैदराबाद किंवा पुणे-पिंपरी चिंचवडसारखी.
जसे अहमदाबादमध्ये कुठल्या पक्षाचे पोस्टर्स दिसत नाहीत तसे गांधीनगरमध्येही नाहीत. ना काँग्रेस ना भाजपा ना नरेंद्र मोदी. गेल्या तीन एक महिन्यांपासून माझी कधी महिन्याला तर कधी पंधरा दिवसाला मुंबई-अहमदाबाद-गांधीनगर अशी फेरी असते. होत राहतील आमचं एक घर सध्या गांधीनगरला आहे.
गांधीनगरला होणाऱ्या चकरांनी माझ्यात सर्वात मोठा कुठला बदल झाला? मला वाटतं नरेंद्र मोदींबाबत माझं मत पुर्णपणे बदललं. मत बनवण्याची माझी एक पद्धत आहे. कुणी कितीही सांगितलं तरी इतरांच्या सांगण्यावरून माझं अमुक अमुक म्हणून मत बनत नाही. एक तर प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा प्रयत्न करतो किंवा मग सारासार विचाराची फुटपट्टी लावतो. मोदींबाबतही तसच.
पाच सहा वर्षापासून मोदींबात उलटसुलट बरंच काही ऐकुण झालंय. त्यामुळे नैसर्गिकरित्या एक प्रतिमा डोक्यात तयार झाली. गुजरात दंगे घडवणारे मोदी. ते वास्तव आहेच. ते मोदीही नाकारणार नाहीत. पण तरीही मी मोदींच्या नेतृत्वानं भारावलोय.
गुजरातमध्ये सध्या व्हायब्रंट गुजरात समिट सुरु आहे. हे पाचवं जागतिक संमेलन. जवळपास ८० देशातून उद्योगपती गांधीनगरला तीन दिवसांसाठी एकत्र आलेत. गुजरातच्या विविध भागात गुंतवणूक होण्यासाठी मोदींनी सुरु केलेलं हे संमेलन दरवर्षी भरतं. एका व्यासपीठावर येण्याचं टाळणारे अंबानी बंधू मोदींच्या दोन्ही बाजुला बसलेले दिसतायत. एवढंच नाही तर टाटा, गोदरेज,महिंद्रा ही मंडळीही व्यासपीठावर आहेत. त्यांच्यासोबत देशोदेशीचे उद्योगपती गुजरातच्या गुंतवणुकीवर चर्चा करतायत. मोदींना हे जे जमलंय ते केंद्राला तरी जमेल?
गुजरात हे उद्योगी लोकांचं राज्य आहे. इथले लोक रेल्वेत टक्क्यांच्याच गप्पा मारतात हा माझा अनुभव. पण मोदी फक्त व्यापाऱ्यांचंच हित सांभाळतात का? नाही. गेल्या काही काळात मोदींनी राबलेल्या काही भन्नाट आयडीया त्याचा पुरावा. काही आठवड्यांपुर्वी गेलो होतो त्यावेळेस तिथं मोदींच्या ‘स्वागतम’ची चर्चा सुरु होती. मी थोडीशी माहिती घेतली आणि अवाक झालो.
स्वागतमची आय़डिया अशी. समजा तुमचं एखादं काम भूमी अभिलेख कार्यालयात आहे आणि तिथला अधिकारी तो करत नसेल तर ते काम घेऊन तुम्ही तालुका ‘स्वागतम’मध्ये जायचं. तहसिलदारदर्जाचा किंवा वरिष्ठाकडे तक्रार द्यायची. समजा त्यानंही काम नाही केलं तर ‘जिल्हा स्वागतम’मध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे जायचं. जिल्हाधिकाऱ्यानेही तक्रारीची दखल घेतली नाही तर मोदींकडे जायचं. मोदी स्वागतममध्ये आलेल्या तक्रारी संबंधीत विभागांकडे पाठवल्या जातात. संबंधीत अधिकाऱअयांसह राज्यभरातले जिल्हाधिकारी, एसपी मोदींसमोर लाईव्ह असतात व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे. दर काही महिन्यांनी सीएम स्वागतम असतंच.
तक्रारदाराला मोदी बाजुच्या खुर्चीवर बसवतात आणि संबंधीत अधिकाऱ्याला जाब विचारतात, का रे बाबा या व्यक्तीचं काम का नाही झालं? अधिकाऱ्यानं जर सांगितलं की तक्रारदारानं आवश्यक असलेले कागदपत्रं पुरवली नाहीत तर मोदी तक्रारदाराला विचारतात..समजा चुक अधिकाऱ्याची असेल तर मोदी तिथंच आदेश जारी करतात. आणि समजा तक्रारदारानं आवश्यकबाबींची पुर्तता केलेली नसेल तर त्याला तसं सांगतात..पण मोदी निर्णय देतात हे नक्की. विशेष म्हणजे हिरोगिरी करत नाहीत. म्हणजे उगिचच अधिकाऱ्यांना झापत नाहीत किंवा तक्रारदार सरळ मोदींकडेच आला असेल तर त्याला अगोदर संबंधीत पहिल्या अधिकाऱ्याकडे पाठवतात. तालुका स्वागतममध्ये हे विशेष.
स्वागतममध्ये जाऊन आलेल्या एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलेलं अनुभव अधिक बोलका आहे. एक जण मोदी स्वागतममध्ये एका अनाधिकृत बिल्डिंगची तक्रार घेऊन गेला. बिल्डींग तर अनाधिकृत आहेच पण सोसायटीतले लोक त्रास देतायत अशी तक्रार. मोदीनं संबंधीत शहराच्या जिल्हाधिकारी आणि संबंधीत पालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारलं की तक्रारीत किती तथ्य आहे? अधिकाऱ्याला स्पष्ट उत्तर देता येईना? त्याची तारांबळ उडाली? मोदींनी एक साधा प्रश्न विचारला की बिल्डींग अनाधिकृत आहे की नाही? अधिकाऱ्यानं अखेर सांगितलं हो..अनाधिकृत आहे..मग पाडली का गेली नाही? मोदींचा पुढचा प्रश्न. कारण बिल्डींगमध्ये सगळे दादा लोक राहतात. अधिकाऱ्याचं उत्तर..मोदींनी फॅक्सवरून बिल्डींगचे सगळी कागदपत्रं लगेचच मागवून घेतली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ती तिथंच तपासली आणि बिल्डींग अनाधिकृत असल्याचं सांगितलं. मोदींनी आदेश दिला की ही बिल्डींग उद्या संध्याकाळपर्यंत पडली पाहिजे मग ती कुणाचीही असो आणि तसा रिपोर्ट सादर करा..मोदींचा झटपट निर्णय.
या स्वागतमचा परिणाम असा आहे की कुठलाच अधिकारी एखाद्या व्यक्तीला भेटायचं टाळू शकत नाही. कारण भेट टाळली तर तो तक्रार मोदींकडे घेऊन जाईल अशी भीती. त्यातून अधिकाऱअयांना तक्रारदारांची फक्त भेटच घ्यायचीय असं नाही तर तक्रारीचं निवारणंही करायचंय म्हणजेच काहीही करून कामातून सुटका नाही. आपल्याकडे कधी हे होईल? आमदार, मंत्र्यांचा दरबार भरवला तर त्यात तेच गायब असतात आणि अधिकारीही तिकडं फिरकत नाहीत.
मोदींनी इतर राबवलेल्या काही कल्पनांनी तर अवाक व्हायला होतं. गुजरातला वाचतं करायचंय तर काय करावं? मोदींनी सांगितलं ‘वाँच्छे गुजरात’. म्हणजे राज्यातल्या सामान्य लोकांसह सगळे अधिकारी मग तो कारकून असो की सुपर क्लास वन. सगळ्यांनी कुठल्याही वाचनालयात जाऊन तासभर वाचायचं. काहीही वाचा पण वाचा. त्याची सुरुवात खुद्द मोदींनी केली. मोदीच गेले म्हटल्यानंतर मंत्री गेले, अख्ख मंत्रीमंडळ गेलं म्हणजे अधिकारीही गेलेच, जावंच लागणार तसा अधिकृत आदेश असतो. अन्यथा कारवाई त्यामुळे दांडीला संधी कमी. वाचनाचा अहवाल अधिकाऱ्यांना सादर करावा लागतो. त्यावर चर्चा होते. आपल्याकडे जसं ज्ञानेश्वरीचं पारायण होतं तसं गुजरातमध्ये वाँछे गुजरातची पारायणं लागली. अख्खं गुजरात वाचत राहिलं. एका कल्पनेनं अख्खा गुजरात जोडला गेला. करिश्मा तयार होणार नाही तर काय?
पुढच्या दोन आयडिया ऐकल्यानंतर तर तुम्हीही मोदींना दाद द्याल. मोदींनी ‘गुणोत्सव’ नावाचा कार्यक्रम राबवला. म्हणजे राज्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांनी मग तो क्लास वन असो की सुपर क्लास वन. प्रत्येक दिवशी पाच असं तीन दिवस १५ शाळांमध्ये जाऊन शिकवायचं. तीन दिवसांसाठी ही त्यांची अधिकृत ड्युटी. राज्याच्या मुख्य सचिवाचीही सुटका नाही. काय शिकवलं त्याचा अहवाल सादर करायचा. कुठल्या अधिकाऱ्यानं कुठल्या शाळेत शिकवायचं याची अधिकृत लिस्ट दिली जाते. कुणीही उठून कुठेही जायचं नाही आणि पाट्या टाकून यायचं नाही. गावात गेल्यानंतर अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांशी बोलायचं. समस्या जाणून घ्यायच्या. एखाद्या घरातले जर मुलीला शाळेत पाठवत नसतील तर त्यांच्याशी बोलायचं. पुस्तक, गणवेशाचा प्रश्न असेल तर तो तिथंच सोडवायचा. परिणाम असा की राज्याच्या मुख्य सचिवालाही शाळेची काय स्थिती आहे हे कळतं आणि लोकांनाही सरकार आपल्या शाळेत येतं याचं समाधान वाटतं. परिणाम गुजरातमधल्या जि.परिषद,पंचायत समित्यांच्या निवडणुका झाल्या. मतदानाची टक्केवारी होती ९२ टक्के. सत्ता अर्थातच भाजपाचीच म्हणजेच मोदींचीच.
लोक आणि प्रशासन यांच्यातलं अंतर मिटवायचं? काय करावं? मोदींनी सांगितलं ‘खेलोत्सव’ म्हणजे अख्ख्या गुजरातनं खेळायचं. कल्पना चांगली आहे पण वाटतं तितकी सोपी नाही. पैसा, व्यवस्था राबवावी लागते. पण ती हिट झाली. खेलोत्सवमध्ये अगोदर गाव पातळीवर लोका, स्थानिक नेते,अधिकाऱ्यांनी खेळायचं. खेळ कुठलाही असो. खेळायचं. नंतर तालुक्यावर खेळायचं त्यानंतर जिल्ह्यावर नंतर विभागावर आणि नंतर फायनल राज्यपातळीवर. इथंही सगळं अधिकृत..खेळासाठी मोदी सरकार पैसे उपलब्ध करतं. खेळणाऱ्या अधिकाऱ्यांच्या ड्युटी तशा लावल्या जातात. गाव, तालुका, जिल्हा, विभाग सगळीकडे खेळ होतायत म्हणजेच आपोआपच मैदानं तयार झाली, असलेली सुधारली, नवीन खेळाडू मिळाले. अधिकाऱ्यांसोबत दोन हात करायची संधी लोकांना मिळाली. लोकांचा आणि अधिकाऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहणारा. काही अधिकारी त्यांच्या टीमची चर्चा करतायत हे दृश्यच मला सुखावणारं होतं. मोदी द ग्रेट.
आणखी एक गोष्ट सांगण्याचा मोह आवरत नाही. आता ज्या ठिकाणी व्हायब्रंट गुजरात समिट होतेय तिथंच मोदींनी महात्मा मंदीर उभारलंय. मंदीर म्हणजे गांधीजींचं मंदीर नाही तर त्यांच्या नावावर एक मोठी वास्तु उभी केलीय ज्यात समिट होतेय. महात्मा मंदीराची उभारणीही भन्नाट झालीय. मंदीराच्या पायाउभारणीचा दिवस ठरवला. त्या दिवशी प्रत्येक गावच्या सरपंचाला गावची माती आणि पाणी घेऊन गांधीनगरला बोलवलं. खुद्द मोदींनी प्रत्येक सरपंचाकडून माती-पाणी स्वीकारलं आणि त्यातून पायाभरणी झाली. प्रत्येक जोडप्याची व्यवस्थित आणून सोय केली. बोलवलं आणि वाऱ्यावर सोडलं असं नाही. मोदींच्या एका कल्पनेनं दूर गावात असलेला गावकरी आणि समिटमध्ये बसून चर्चा करणारा उद्योगपती जोडला गेला. चर्चा करणारे कुठल्या तरी दुसऱ्या जगातले लोक आहेत ही भावना त्या गावकऱ्याच्या मनात येण्याऐवजी तो आपसूकच उद्योगपतींशी जोडला जातो. म्हणजे भारत आणि इंडिया मोदींनी एका कल्पनेनं जोडण्याचा प्रयत्न केलाय.
गुजरात आणि महाराष्ट्र दोन्ही जुळी भावंडं. दोन्ही सुवर्णमहोत्सव साजरा करतायत. मला महाराष्ट्रात एकदाही त्याचा फील आला नाही. गुजरातमध्ये त्याचा विसर पडत नाही. मी इथं एकही प्रश्न उपस्थित करणार नाही कारण हे वाचल्यानंतर जे तुमच्या मनात येईल तेच माझ्या मनात आहे.
पुढची निवडणुक ज्यावेळेस येईल त्यावेळेस जर राहुल गांधींना मतदान द्यायचं की पंतप्रधानपदासाठी मोदींना तर मी मोदींची निवड करण्याचं निश्वित केलंय. कारण दंगली कोण घडवत नाही? पण एखादा तरी सुपर क्लास वन अधिकारी मग तो आयएएस असो की आयपीएस मला माझ्या गावात येताना पाहायचंय जे सध्यस्थिती अशक्य वाटतं.