Saturday, February 20, 2010

animal farm

ही घटना गेल्या महिन्यातली. मी मुंबईहून हैदराबादला जात होतो. माझ्या बसमध्ये एक प्रवासी चढला. माझ्या बाजुच्याच रांगेत बरोबरीनं त्याचा नंबर आलेला. गाडीत चढला तेव्हापासूनच त्याची चुळबुळ चाललेली. उगीचच त्यांनं गाडीच्या क्लिनरला बोलण्याचा प्रयत्न केला. काही वेळानं त्याला काय हवं आहे ते कळलं. त्यानं गाडीच्या मधोमध खाली झोपायची परवानगी मागितली होती. क्लिनरनं त्याला पहिल्याच प्रयत्नात नकार दिला. त्याची चुळबुळ सुरुच होती. गाडीनं पुणं सोडलं त्यावेळेस रात्रीचे अकरा वाजलेले. त्यानं पुन्हा त्या क्लिनरला हटकलं. क्लिनरनं पुन्हा नकार दिला. शेवटी तो प्रवाशी वैतागून म्हणाला मी ‘सरकार’चा माणूस आहे, बघून घेईन. क्लिनरच्या चेह-यावरची रेषाही हलली नाही. मला मात्र त्या सरकारी माणसाची कीव आली. स्वतःची सरकारी ओळख देऊनही त्याच्या पदरी निराशाच आली होती. हा प्रसंग लक्षात राहण्यासाठी निमित्त घडलं होतं, दिल्लीतल्या घटनेचं... ही घटना होती एप्रिल महिन्यातली. माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दूल कलाम कॉन्टिनेंटल एअरलाईन्सनं दिल्लीहून न्यूयॉर्कला जात होते. देशाचे माजी राष्ट्रपती असूनही त्यांच्यासोबत फारसा लवाजमा नाही. त्यामुळं, विमानाकडं जात असताना विमानाच्या चार कर्मचा-यांनी त्यांना वाटेतच थांबवलं. आणि त्यांची झडती सुरु केली. कलामांनी कसलाही विरोध न करता सर्व प्रक्रिया पुर्ण केली. सुरक्षा रक्षकांनी सांगितलं, बुट काढा तर त्यांनी तेही केलं. तेही आपल्या युनिक स्मितहास्यासह. त्या टिनपाट कर्मचा-यांपुढं आपला रुबाब गाजवावा असं त्यांना चुकूनही वाटलं नाही.... आणि तसाच हाही एक प्रसंग. हा प्रसंग लिओ टॉलस्टॉयबद्दलचा. नेमका कुठल्या रेल्वेस्थानकावरचा आहे हे नक्की माहित नाही. पण तो मॉस्कोतलाच असावा. टॉलस्टॉय त्यावेळेस रशियन सैन्यात कार्यरत होते. ते आपल्या काही सैनिकांची स्टेशनवर वाट पाहत होते. मॉस्कोत गोठवणारी थंडी असते त्यामुळे त्यांच्या अंगावरच्या कपड्यांमुळे कोण लष्करातले आणि कोण सर्वसामान्य हे काहीच कळत नव्हतं. एक बाई तिथं आली. तिला वाटलं, हा उभा असलेला गृहस्थ कुली आहे. तिनं टॉलस्टॉयला गाडीतलं सामान उतरायला सांगितलं. टॉलस्टॉय काही वेळ गोंधळले. पण त्यांनी पुढच्याच क्षणी त्या बाईचं सगळं सामान ऊतरवून दिलं. तितक्यात तिथं सैनिक आले आणि त्यांनी टॉलस्टॉयला सॅल्यूट ठोकला. त्या बाईला काही कळेच ना! हे सैनिक एका कुलीला का सॅल्यूट मारतायत? त्या बाईनं विचारल्यानंतर टॉलस्टॉयनं आपली ओळख करून दिली. त्या बाईचा विश्वासच बसेना. आपल्यासमोर सार्वकालीन महान कादंबरीकार उभा आहे. एवढच नाही तर त्यानं आपलं सामानही उतरवून दिलं. बाई खजिल झाल्या. त्यांनी टॉलस्टॉयची माफी मागण्याचा प्रयत्न केला. पण टॉलस्टॉयनेच त्यांचे आभार मानले, ते त्यांनी दिलेल्या कामाबद्दल. एवढच नाही तर कुलीला देणार होत्या ती रक्कमही टॉलस्टॉयनं स्विकारली. टॉलस्टॉय ग्रेट!ही घटना गेल्या काही दिवसातलीच. लालु प्रसाद यादव, शिवराज पाटील, मुलायमसिंग यादव, रामविलास पासवान अशा सत्तेत नसलेल्या लोकांची झेड दर्जाची सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय सरकार घेत आहे, याचा सुगावा या मंडळींना लागला आणि त्यांनी अख्खी संसद डोक्यावर घेतली. आपल्या जीवाला कसा धोका आहे, याचे ढिगभर दाखले दिले. सरकारला इशारेही. या कसलाही धोका नसलेल्या नेत्यांच्या सुरक्षेसाठी सरकार दरवर्षी पाचशे कोटी रूपये खर्च करतं. काही राज्यातल्या शेतक-यांना जी कर्जमाफी दिलीय त्याच्या रकमेपेक्षा जास्त.ख-या-खोट्या प्रतिष्ठेसाठी देशामध्ये अशा अनेकविध प्रकारच्या घडामोडी घडत असताना अचानकपणे एक गोष्ट ध्यानात आली की, आपल्या देशात अशीही एक व्यक्ती आहे, ज्याची कधीही, कुठेही झडती घेतली जाऊ शकत नाही. विशेष म्हणजे, तो कधी या देशाचा पंतप्रधान नव्हता वा राष्ट्रपती. तो कधी सरन्यायधीशपदावरही राहिलेला नाही. एवढंच कशाला, ज्यांची कधीही झडती घेतली जाऊ शकत नाही अशा पदांची जी यादी भारत सरकारनं तयार केलीय, त्यापैकीही कुठल्या पदावर हे महाशय राहिलेले नाहीत. आणि तरीही त्याची झडती कुणीच घेत नाही घेऊ शकत नाही. तसा सरकारचाच फतवा आहे. ही व्यक्ती जवाहरलाल नेहरू यांचा पणतू जावई, इंदिरा गांधी यांचा नातजावई,राजीव आणि सोनिया गांधी यांचा जावई,राहुल गांधी यांचा मेहुणा आणि प्रियंका गांधी यांचा नवरोबा आहे. या महाशयाचं नांव रॉबर्ट वडेरा, वधेरा किंवा वड्रा... काहीही म्हणा. कारण याची ओळख त्याचं आडनाव नाहीच मुळी. या रॉबर्ट वडेराची कधीही, कुठेही झडती घेतली जाऊ शकत नाही, कारण तो गांधी घराण्याचा जावई आहे. त्यामुळे, या देशाच्या आजी-माजी राष्ट्रपतींना, पंतप्रधानांना, सरन्यायधीशांना जी ट्रीटमेंट विमानतळावर दिली जाते, तीच रॉबर्टलाही दिली जाते. याचा अर्थ, हे रॉबर्ट महाशय पंतप्रधान, सरन्यायधीश यांच्या इक्वल आहे. तुम्हाला जॉर्ज ऑरवेल आठवतो. ऑल आर इक्वल बट सम आर मोअर इक्वल.रॉबर्ट मोअर इक्वलमध्ये मोडतो. पाच प्रसंग वेगवेगळ्या लोकांचे. वेगवेगळ्या ठिकाणी घडलेले आणि वेगवेगळ्या उंचीच्या लोकांचे. पण यातच सामाजिक संघर्ष आहे, तक्रार आहे आणि हिंसाही. काही माणसं नेहमीच इतरांच्या ओळखीवर जगतात तर काही स्वतःची ओळख इतरांना देतात ज्या व्यक्तींची उंची मोठी आहे तो फळानं लगडलेल्या झाडासारखा असतो, तर काही माणसं बुटकी असतात. ती तशीच राहतात आणि दाखवतातही. सरकारी बाबू हा या बुटक्यांच्या जातकुळातला..., लालू, मुलायम ही मंडळी सत्तासाधनांवर ओळख टिकवणा-यांपैकी... रॉबर्ट वडेरा दुस-याच्या ओळखीवर जगणारा तर टॉलस्टॉय, कलाम दुस-यांना ओळख देणारे. आपण यापैकी नेमके कोण? किंवा कुणीही नाही! कलामांबाबत जे घडलं, त्यानं प्रत्येक सदविवेकी माणसाचा संतापच झाला असेल. पण त्यांनी ज्या शांतपणे झडती घेऊ दिली... त्यामागच्या हेतुचा विचार मनात आल्यावर मात्र संतापाची जागा जाणीवेनं घेतली. कलामांनी खरं तर एक चांगली सुरुवात केलीय, ती आपण का फॉलो करू नये? का या देशातल्या पदावर नसणा-या नेत्यांना, अधिका-यांना सामान्य माणसाप्रमाणेच वागणूक दिली जाऊ नये? या लोकांना आपण असं महत्व का द्यावं आणि कुणी देत असेल तर ते का खपवून घ्यावं? का सरकारी अधिका-यांना आणि नेत्यांना सांगू नये की आता बस्स.., खुप झालं! तुमचा उद्दामपणा आता खपवून घेतला जाणार नाही. रॉबर्ट वडेराचं असं काय कर्तृत्व आहे, ज्यामुळे त्याची झडती होत नाही तुमची आणि माझी होते? यासंदर्भात, नुसती बोलबच्चनगिरी करण्याऐवजी मी माझ्यापासून सुरुवात केलीय. कलामांची घटना घडल्यानंतर मला स्वत:लाही काही गोष्टी नव्यानं उमजल्या. सुरुवातीला मी ऑफिसमध्ये प्रवेश करत असताना सुरक्षा रक्षकांमुळे अवघडून जायचो. ओळखीचा झाल्यानं तेही मला कधी हटकत नाहीत. पण आजकाल मी स्वत:च आपले ओळखपत्र दाखवून ऑफिसात प्रवेश करतो. सुरक्षा आणि सुरक्षारक्षक माझ्या सुरक्षेसाठी आहेत, याची जाणीव ए. पी. जे. कलाम आणि टॉलस्टॉय यांच्या संस्कारांमुळे माझ्या मनाला झालेली आहे. काल थोडी गंमत झाली... ऑफिसच्या गेटमधून मी आत शिरत होतो, त्याच वेळेस तिथून लक फिल्मची हिरोईन आणि कमल हसन-सारिकाची मुलगी श्रुती हसन आत शिरत होती. सुरक्षारक्षकाकडं ढुंकनही न बघता. त्यांना धुडकावून, ती ऑफिसमध्ये सरळ आतपर्यंत निघून गेली. सुरक्षारक्षक तिच्याकडेच अवाक होऊन पाहतच राहिले.... हे थांबलं तरच जॉर्ज ऑरवेलचं वाक्य आपल्याला आठवावं लागणार नाही. खरं की नाही?

2 comments:

  1. एकदम मस्त, आवडले आपल्याला. असे सडेतोड लिखाण आता फारसे वाचायला मिळत नाही, सडेतोड पत्रकारिता आणि पत्रकार ही राहिले नाहीत. पण असे लिही शकणारे खूप पत्रकार अजूनही आहेत. परंतु ते आपापल्या पेपर अथवा चानेल च्या धोरणात अडकले आहेत. खेर तर त्यांच्यासाठी ब्लोग उत्तम साधन आहे. आपले विचार लोकांपर्यंत पोहचून त्यानाही विचार करुअला लावण्याच्या चळवळीचा हा एक भाग ठरू शकेल. आपल्या लीकाहानास शुभेछा.

    ReplyDelete